एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
गांवकऱ्यांच्या सहभागातून गावाच्या विकासाचे निर्णय घेण्यासाठी महत्त्वाची असलेली ग्रामसभा तातडीने घेण्यात यावी अशी मागणी ग्रामपंचायत सदस्यांसह गांवकऱ्यांनी केली आहे. या संदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनाही निवेदन सादर करण्यात आले आहे.
कुंभार पिंपळगांव (ता.घनसावंगी) येथे १५ ऑगस्ट रोजी ग्रामसभा झालीच नसल्याची बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे, ग्रामसभा घेण्यात यावी यासाठी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी १३ ऑगस्ट रोजीच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन सादर केले होते. मात्र, १९ तारखेपर्यंत ग्रामसभा झाली नसल्याचे संबंधित सदस्य व ग्रामस्थांनी सांगितले आहे.
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ग्रामपंचायतीस १५ ऑगस्ट निमित्त असलेली ग्रामसभा आयोजित करण्याचे आदेश द्यावेत, अशी स्पष्ट मागणी करण्यात आली होती. तसेच ग्रामसभा आयोजित न केल्यास अथवा ग्रामसभा घेण्यासंदर्भातील नियमांचे उल्लंघन झाल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्यास, संबंधित अधिकारी व पदाधिकाऱ्यांवर लागू कायद्यानुसार योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी तक्रारीत करण्यात आली होती.
ग्रामसभा ही ग्रामपंचायतीच्या कारभारातील केवळ औपचारिक बैठक नसून गावातील विकासकामे, शासकीय योजना, लाभार्थी निवड, सार्वजनिक प्रश्न आणि ग्रामपंचायतीच्या कामकाजावर चर्चा करण्याचे महत्त्वाचे व्यासपीठ आहे. त्यामुळे ग्रामसभा घेण्यासंदर्भातील नियमांचे पालन झाले आहे की नाही, याची चौकशी होणे आवश्यक आहे.
आता मुख्य कार्यकारी अधिकारी या तक्रारीची दखल घेऊन कोणती भूमिका घेतात, ग्रामसभा न घेण्यामागील नेमके कारण काय आहे आणि या प्रकरणात कोणाची जबाबदारी निश्चित होते, याकडे गांवकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनावर ग्रामपंचायत सदस्य आबासाहेब राऊत, कांताबाई चव्हाण, गंगुबाई पांचाळ, विजय कंटुले, सारीका कंटुले, रफीक कुरेशी, महेमदाबी कुरेशी, शमिनाबी पठाण, प्रकाश बिलोरे यांच्यासह फिरोज कुरेशी, राधाकृष्ण भालेकर, एकनाथ चव्हाण, मजर पठाण, मोईन कुरेशी, बुढन शेख, गणि शेख, मुरली आढे, आण्णासाहेब कंटुले, ताहेर पठाण, आप्पासाहेब कंटुले, भागवत राऊत, ज्ञानेश्वर कंटुले, सखाराम कंटुले, आसाराम कंटुले, शारूख पठाण, मतीन शेख, भागवत कंटुले इत्यादी नागरिकांच्या सह्या आहेत.