एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
जालना जिल्ह्यात नेमकं चाललंय काय ? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. एकामागून एक घोटाळे उघडकीस येत असल्याने जिल्ह्यात नुसते घोटाळेच सुरू आहेत की काय असा सवाल काही दिवसांपूर्वी एल्गार न्यूजने उपस्थित केला होता आणि तेच खरे ठरत असून आता पुन्हा एक घोटाळा कृषि विभागात उघडकीस आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, शासनाच्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना (पोकरा) अंतर्गत जालना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे वरिष्ठ पातळीवर लक्षात आल्याने विभागीय पथकाकडून आता जिल्ह्यात तपास सुरू करण्यात आला आहे. २१ जून पासून सदरील पथक हे जिल्ह्यात दाखल झाले असून १८ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वामध्ये जिल्ह्यात ३८ पथकांच्या माध्यमातून तपासणी सुरू झाली आहे.
नेमका घोटाळा काय ?
शासनाच्या पोकरा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेडनेट उभारण्यासाठी लाखो रूपयांचे अनुदान दिले हाते, मात्र जालना जिल्ह्यात कृषि विभागातील अधिकारी आणि संबंधित एजन्सी यांनी संगणमत करून एकच शेडनेटगृह अनेक ठिकाणी दाखवून, बोगस शेतकऱ्यांच्या नावावर किंवा फक्त कागदोपत्री दाखवून कोट्यावधी रूपयांचा घोटाळा केल्याची तक्रार जाफ्राबाद येथील सुरेश गवळी यांनी केली होती. सदरील तक्रारीत तथ्य आढळून आल्याने तत्कालीन उपविभागीय अधिकारी यांना निलंबित करण्यात आले होते.
विभागीय पथकाकडून चौकशी !
प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेवून विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाकडून १८ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली ३८ पथके स्थापन करून जिल्ह्यात शेडनेटची तपासणी सुरू आहे. एकूण ३४७० शेडनेट पैकी १०९६ शेडनेटगृहांची तपासणी करण्यात आली असून उर्वरित २३७४ शेडनेटची तपासणी करण्यात येत आहे. सदरील पथक हे जवळपास १५६ गावांमध्ये जावून शेडनेटची तपासणी करत आहे.
विषय फक्त शेडनेटचा नाही !
प्रदेश कॉंग्रेस कमिटी (पर्यावरण विभाग) चे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश गवळी यांनी मागील काळात केलेल्या तक्रारीनुसार विषय फक्त शेडनेटचा नाही तर, शेडनेटसह अवजारे बॅंक, माल वाहतुक वाहन आयशर, गोडावून, ठिबक सिंचन या सर्वांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचे सांगण्यात आले आहे, तसेच दोषींवर गुन्हे दाखल करून कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे. याबाबत सुरेश गवळी यांनी एल्गार न्यूजला माहिती देतांना सांगितले की, घोटाळा जालना, बदनापूर, भोकरदन, जाफ्राबाद या ४ तालुक्यापुरता मर्यादित नाही तर जालना जिल्ह्यातील ८ ही तालुक्यात हा घोटाळा झालेला आहे. त्यामुळे चौकशी फक्त ४ तालुक्याची होते की संपूर्ण ८ तालुक्याची होते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
जिल्ह्यात नुसते घोटाळेच सुरू ?
कधी हर घर जल घोटाळा, कधी अनुदान घोटाळा, कधी शिक्षकांच्या पैशांवर डल्ला मारल्याचा घोटाळा असे अनेक घोटाळे एकामागून एक उघड होत असतांना आता पुन्हा एक कृषि विभागाचा घोटाळा समोर आला आहे, त्यामुळे जालना जिल्ह्यात नुसते घोटाळेच सुरू आहेत की काय ? असा सवाल सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. त्यामुळेच की काय जालना जिल्ह्यात जिकडे नजर फिरवाल तिकडे कार्यालयांमधून भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांचा धुप्पन निघत असल्याची प्रतिक्रिया नागरिक देत आहेत.