एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
एखादी फाईल टेबलावर असावी आणि जो पर्यंत त्या फाईलला नोटांचा स्पर्श होत नाही तो पर्यंत ती फाईल पुढे सरकूच नये, जणू असाच काही प्रकार सध्या ग्रामीण भागात पहायला मिळत आहे, म्हणजे काही दिल्याशिवाय सर्वसामान्य लाभार्थ्यांना शासनाच्या योजनांचा लाभ सहज मिळणे अवघड होवून बसल्याचे दिसत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगांव व तालुक्यातील अनेक गावांमध्ये शासनाने विविध योजनांतर्गत मोठ्या संख्येने घरकुल मंजूर केले आहेत. घरकुलची यादी गावात आली आहे. यादी आली म्हटले की अवघ्या काही मिनिटात ती गावातील एजंटला माहित होते आणि सुरू होतो देण्याघेण्याचा कार्यक्रम. अर्थातच एजंट यादीनुसार गावातील लाभार्थ्यांना भेटत असून तुम्हाला घरकुलचा लाभ पाहिजे असेल तर सध्या २००० रूपये द्यावे लागतील असे सांगत आहेत.
पैसे द्यायचे कशाचे ?
बहुतांश लोक एजंटांच्या जाळ्यात अडकत आहेत, परंतू घरकुल तर शासनानेच मंजूर केलंय मग एजंटला २ हजार रूपये द्यायचे कशाचे ? असाही प्रश्न अनेकांना पडलाय. परंतू एजंट काहीही ऐकत नाही, फुकट घरकुल मिळत असेल तर २ हजार द्यायला काय हरकत आहे, असे एजंट हे लाभार्थ्यांना सांगत आहेत. शिवाय पैसे नाही दिले तर तुम्ही तुमचं बघा, हप्ता नाही आला तर आम्हाला सांगू नका असेही सांगत आहेत, अशी प्रतिक्रिया गावातील काही बांधवांनी दिली आहे.
हा तर फक्त इसारच !
एजंटला आत्ता २ हजार दिले म्हटले की पंगत संपली किंवा गोंधळ संपला असे नाही. पहिला हप्ता, दुसरा हप्ता, तिसरा हप्ता किंवा जेवढे हप्ते असतील तेवढ्या हप्त्याला एजंटला ५ ते १० हजार द्यावे लागत असल्याचे अनेकजण सांगत आहेत. हप्त्याच्या वेळी तर असे सांगितले जाते की, वर द्यावे लागतात तेव्हाच तुमच्या खात्यात पैसे येतील नसता पैसे येणार नाहीत. अकाउंट मध्ये हप्ता यावा असे वाटत असेल तर दक्षणा द्यावीच लागेल नाही तर बसा बोंबलत, असेही एजंट बोलत असल्याचे नागरिक सांगत आहेत.
फक्त तुमच्यासाठीच !
सध्या एजंट प्रत्येकाला घरोघरी किंवा बाहेर चौकात, रस्त्यावर असे भेटत आहेत जसं लग्नपत्रिका द्यायला आल्यावर सांगितले जाते की खास तुमच्यासाठीच इथपर्यंत आलोय, म्हणजे फक्त तुमच्यासाठीच आम्ही धडपड करतोय. म्हणजेच तुम्ही जे २ द्याल ते वर देवून तुमचा हप्ता लवकर टाकायला सांगतो, अशी सुध्दा प्रेमळ (?) भाषा माणसं पाहून लाभार्थ्याला सांगितली जात आहे.
ग्रामपंचायतची सुध्दा वसुली !
कुंभार पिंपळगांव ग्रामपंचायत लाभार्थ्यांकडून घरपट्टी किंवा इतर थोडंफार कर वसूल करत असेल तर त्यास नागरिकांची हरकत नाही. (नळ पट्टी वसूल करता येणार नाही, कारण ग्रामपंचायतने अजून नळ कनेक्शनच दिले नाही अर्थात पाईपलाईनच नाही, मग नळपट्टी कशाची ? ) परंतू जे काही कर वसूल केला जात आहे त्याची रितसर ओरीजनल पावती देणे आवश्यक आहे. शिवाय जमा झालेले पैसे ग्रामपंचायतच्या ओरीजनल अकाउंट मध्ये जाणे सुध्दा आवश्यक आहे. बाहेरच्या बाहेर कोणी बोगस पावती देणार नाही, किंवा घरपट्टीच्या नावाखाली कोणी खिसे गरम करणार नाही याची दक्षता ग्रामपंचायतने घेणे गरजेचे आहे.
एजंट नेमके कोणाचे ?
सध्या कुंभार पिंपळगावात किंवा ग्रामपंचायतच्या आवारात फिरत असलेले एजंट नेमके कोणाचे आहेत ? सदरील एजंट गावातीलच कोणी नेमले आहेत का ? लोकप्रिय ग्रामसेवक यांनी तर एजंटला सूट दिली नाही ना ? एजंट जर म्हणत असतील की मलाई वर द्यावी लागते तर मग वर म्हणजे नेमके कोण ? असे अनेक प्रश्न गांवकऱ्यांना पडले आहे.
तालुक्यातही एजंट !
एजंटचा किंवा दलालांचा विषय फक्त कुंभार पिंपळगांव पूरता मर्यादित राहिलेला दिसत नाही, कारण घनसावंगी तालुक्यातील अनेक गावांमध्ये एजंट घरकुलच्या नावाखाली लाभार्थ्यांकडून हजारो रूपये उकळत असल्याचे बोलले जात आहे. या गावांमध्ये सुध्दा घरकुलच हप्ता मिळवायचा असेल तर सध्या काही ना काही द्यावेच लागतील असे सांगितले जात आहे. शक्यतो एजंट संबंधित गावातीलच असल्याचे बोलले जात आहे.
चौकशी करा !
घरकुल चा लाभ मिळवून देतो किंवा पुढील हप्ता मिळवून देतो म्हणून जे काही एजंट गावांमध्ये फिरत आहेत किंवा लोकांशी संपर्क साधत आहेत हे कोण आहेत ? त्यांचा आका कोण ? त्यांना आशिर्वाद कोणाचा ? मलाई वरपर्यंत म्हणजे नेमकी कोणापर्यंत जाते याची सखोल चौकशी बीडीओ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी करणे गरजेचे आहे. कारण लोकांना “वरपर्यंत” शब्दाचा अर्थ लक्षात येत नसल्याने लोकं कोणावर संशय व्यक्त करतील काही सांगता येत नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांनी संशय बळावण्याच्या आधीच चौकशी करून योग्य ती कारवाई करावी एवढीच माफक अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
तर थेट मला संपर्क करा – बीडीओ
घनसावंगी तालुक्यातील कोणत्याही गावात एजंट अथवा कोणीही व्यक्ती घरकुल किंवा इतर योजनांसाठी पैसे मागत असेल तर थेट मला ९६२३९०३८४८ या क्रमांकावर (कार्यालयीन वेळेत) संपर्क साधावा अथवा तक्रार करावी, जेणेकरून संबंधितावर योग्य ती कारवाई करता येईल. तसेच कोणी वर पैसे द्यावे लागतात असे म्हणत असेल तर त्याचीही माहिती किंवा तक्रार माझ्याकडे करावी असे आवाहन घनसावंगी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी समीर जाधव यांनी केले आहे.
इतर बातम्या खाली पहा…
नि:पक्ष, निर्भीड व रोखठोक बातम्या नियमित प्राप्त करण्यासाठी एल्गार न्यूजच्या व्हाट्सअॅप ग्रुपला जॉईन व्हा, किंवा 9890515043 हा क्रमांक तुमच्या व्हाट्सअॅप ग्रुप मध्ये अॅड करा…