एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
बॅंक ऑफ महाराष्ट्र ही राज्यातील एक प्रमुख आणि गाव पातळीवर सुध्दा सेवा देणारी बॅंक म्हणून कार्यरत आहे, आजही कोट्यावधी ग्राहकांचा विश्वास बॅंकेवर आहे. केंद्र शासनाच्या अंतर्गत येणारी व राष्ट्रीयकृत बॅंक असल्याने बॅंक आपल्यावर अन्याय करणार नाही अशी सामान्यत: ग्राहकांची भावना असते, परंतू जर बॅंकेच्या संबंधित यंत्रणेकडून कुठलीही माहिती न देता ग्राहकांचे पैसे खात्यातून वजा होणार असतील तर कुंपणच शेत खातंय का ? असा प्रश्न नागरिकांना पडल्याशिवाय राहत नाही.
एकीकडे खाजगी बॅंका ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या ऑफर्स देत आहेत, त्यांना मोफत सुविधा देत आहेत, मात्र दुसरीकडे राष्ट्रीयकृत असलेली बॅंक ऑफ महाराष्ट्र ही बॅंक ग्राहकांना अधिक सुविधा देण्याऐवजी ग्राहकांच्या खात्यावरच दरोडा टाकत आहे की काय ? असा सवाल उपस्थित होवू लागला आहे.
नेमकं प्रकरण काय ?
कुंभार पिंपळगांव (ता.घनसावंगी, जि.जालना) येथील बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखेच्या काही ग्राहकांचे जानेवारी २०२५ मध्ये ३५४ रूपये खात्यातून कट करण्यात आले, त्यावेळेस सांगण्यात आले होते की एटीएम चा वार्षिक चार्ज घेण्यात आला आहे, खरं तर ही रक्कम सुध्दा जास्त आहे, तरीही ग्राहकांनी समजून घेतले परंतू अवघे ५ महिने सुध्दा झालेले नसतांना पुन्हा २ जून २०२५ रोजी ३५४ रूपये कट करण्यात आले आहेत. त्यामुळे सदरील बॅंक नेमका काय गोंधळ करीत आहे असा सवाल ग्राहकांना पडला आहे. (पैसे वजा झाल्याबाबतचा स्क्रीनशॉट खाली दिला आहे)

शाखेकडे उत्तर नाही !
याबाबत बॅंक ऑफ महाराष्ट्र, कुंभार पिंपळगांव शाखेचे व्यवस्थापक हितेश दामोर यांच्याशी संपर्क साधला असता सकाळ पासून २ – ३ ग्राहक अशा तक्रारी घेवून आले आहेत, त्याची चौकशी सुरू आहे. तसेच त्यांनी ऑनलाईन खाते क्रमांक टाकून चेक केले असता मागील ५ महिन्यात २ वेळा पैसे कट झाल्याचे त्यांच्याही निदर्शनास आले, परंतू हे पैसे सेंट्रल कार्यालयाकडून कट झाले आहेत, परंतू खात्यातून हे पैसे का कट करण्यात आले आहेत याबाबत आत्ताच सांगता येत नाही असे त्यांनी सांगितले.
याबाबत छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय कार्यालयाकडेही विचारणा करण्यात आली परंतू माहिती घेवून सांगतो असे सांगितले, परंतू अनेक तास वाट पाहूनही कुठलेही उत्तर मिळाले नाही. कस्टमर केअरला सुध्दा विचारणा केली असता जानेवारी २०२५ मधील ३५४ हे एटीएम चार्जेस होते, परंतू आत्ता २ जून २०२५ रोजी ३५४ रूपये कशाचे कट झाले हे या क्षणाला सांगता येत नाही असे त्यांनी सांगितले.
लूट सुरू केली आहे का ?
राष्ट्रीयकृत बॅंक असतांना ग्राहकांना अधिकाधिक सुविधा देण्याऐवजी बॅंक जर अशा प्रकारे ग्राहकांचे पैसे खात्यातून कट करत असेल तर याला ग्राहकांच्या खात्यावर दरोडा म्हणायचा का ? ज्यांना दिसून आले त्यांनी बॅंक शाखेची संपर्क साधला परंतू ज्यांना कल्पनाच नाही अशा लाखो ग्राहकांचे काय ? जर एका ग्राहकाचे ३५४ रूपये खात्यातून कट होत असतील तर सदरील बॅंकेचे कोट्यावधी ग्राहक आहेत, यदाकदाचित असंख्य ग्राहकांचे जर ३५४ रूपये कट झाले असतील तर हा आकडा शेकडो कोटी मध्ये जावू शकतो.
हा एक घोटाळा असू नये !
आजकाल जिकडे नजर फिरवली तिकडे काही ना काही घोटाळे ऐकायला मिळतात, त्यात ऑनलाईन फसवणूक किंवा घोटाळ्याचे प्रकार जास्तच वाढल्याचे दिसत आहे. सर्व यंत्रणेला अंधारात ठेवून कोणी गैरप्रकार करण्याची शक्यता आजकाल नाकारता येत नाही. त्यामुळेच की काय सदरील बॅंकेमध्ये सुरू असलेला हा प्रकार पाहता हा सुध्दा शेकडो कोटींचा घोटाळा असू नये एवढीच अपेक्षा जनता व्यक्त करत आहे.
कोणतीही बॅंक असो !
कोणतीही बॅंक असो, मग ती राष्ट्रीयकृत असो किंवा खाजगी बॅंक असो, ग्राहकांच्या खात्यातून पैसे वजा करण्यापूर्वी ग्राहकांना कल्पना देणे आवश्यक आहे, शिवाय वर्षभरात कशा कशाचे पैसे वजा करण्यात येत आहेत त्याचेही स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे. मात्र जर अशा प्रकारे कोणतीही राष्ट्रीयकृत किंवा खाजगी बॅंक पैसे वजा करत असेल तर ते अन्यायकारकच आहे.
वरिष्ठांसह शासनाने लक्ष घालावे !
ग्राहक अर्थात नागरिकांच्या मागणीनुसार सर्वप्रथम ग्राहकांचे एटीएम चार्जेस च्या नावाने ३५४ रूपये कट करणे बंद करावे, दुसरं म्हणजे अशा प्रकारे ३५४ रूपये दुसऱ्यांदा किती ग्राहकांचे खात्यातून वजा करण्यात आले याचा तात्काळ तपास करण्यात यावा आणि पैसे परत टाकण्यात यावेत. अवघ्या साडेचार ते ५ महिन्याच्या आत जर ३५४ रूपये खात्यातून दुसऱ्यांदा कट होत असतील आणि संबंधित अधिकारी याबाबत तात्काळ काही स्पष्ट सांगू शकत नसतील तर विषय गंभीर आहे, याची जाणीव बॅंकेचे वरिष्ठ अधिकारी, प्रशासन आणि राज्य व केंद्र शासनाने सुध्दा ठेवणे आवश्यक झाले आहे. नसता वेळ निघून गेल्यावर पश्चाताप करत बसण्यात काहीही अर्थ उरणार नाही.