एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
पैगंबर हजरत मोहम्मद (स.अ.स.) व इतर सर्व धार्मिक महापुरूषांच्या अपमानास प्रतिबंध घालण्यासाठी कठोर कायदे करावेत यासाठी कुंभार पिंपळगांव (ता.घनसांवगी) येथील मुस्लिम समाजाच्या वतीने प्रशासनास निवेदन सादर करून कानपूर येथील पोलीसांनी केलेल्या मनमानी कारवाईचा निषेध करण्यात आला.
याबाबत भारताच्या महामहीम राष्ट्रपती द्रोपती मुर्मू यांना प्रशासनाच्या माध्यमातून निवेदन पाठवण्यात आले असून त्यानुसार कानपूर (उत्तर प्रदेश) येथील ईद-ए-मिलाद च्या मिरवणुकीत आय लव्ह मुहम्मद (स.अ.स.) लिहीलेले फलक लावले म्हणून उत्तर प्रदेश पोलीसांनी अनेक मुस्लिम तरूणांवर गुन्हे दाखल केले आहेत. सदरील प्रकार समोर आल्यानंतर देशभरातून विरोध होत असून मनमानीपणे कारवाई करणाऱ्या कानपूर पोलीसांच्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.
सदरील प्रकार हुकूमशाहीकडे घेवून जाणारा असून संविधान विरोधी असल्याचे म्हटले आहे. भारतीय संविधानाने प्रत्येक भारतीयांना आपापल्या धर्मानुसार वागण्याचा हक्क दिला आहे. सोशल मीडियावर आय लव्ह मुहम्मद (स.अ.स.) ट्रेंड एक नंबरवर झाल्यावर कानपूर पोलीसांनी यु-टर्न घेत कारवाईला दुसरे अॅंगल देवून बचावाची भूमिका स्विकारली असेही निवेदनात म्हटले आहे.
तसेच मुहम्मद पैगंबर साहेबांबद्दलचे प्रेम जीव गेला तरी कायम राहील, भारत हा एक धर्मनिरपेक्ष, समाजवादी व लोकशाही गणराज्य आहे, संविधानाच्या प्रस्तावनेत व मुलभूत हक्कामध्ये (विशेष अनुच्छेद २५ व २६) प्रत्येक नागरिकाला धर्म स्वातंत्र्य व श्रद्धा आचरणाचे हक्क मान्य करण्यात आले आहे. असेही निवेदनात म्हटलेआहे.
कानपूर येथे विविध विकृतींनी व समाजकंटकांनी धार्मिक महापुरूषांचा विशेषत: पैगंबर हजरत मोहम्मद (स.अ.स.) यांच्यावर अपमानकारक भाषेचा उल्लेख केला आहे, असे प्रकार करून समाजामध्ये द्वेष व तणाव वाढवून राष्ट्रीय एकात्मता धोक्यात आणण्याचे प्रकार करण्यात येत असल्याचे दिसत आहे. या वारंवार होणाऱ्या कृत्यांना रोखण्यासाठी कठोर तातडीच्या उपाययोजना करण्याची मागणीही निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
कुंभार पिंपळगांव येथील मुस्लिम समाजाच्या वतीने दि.२६ रोजी प्रशासनास निवेदन सादर करून सदरील घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला, यावेळी गांव व परिसरातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.