एल्गार न्यूज :-
जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील राजाटाकळी येथील युवकाचा अपहरण करून खून झाल्याचे समोर आले असून घटनेमुळे तालुक्यासह जिल्हाभरात खळबळ उडाली आहे.
याबाबत वृत्त असे की, घनसावंगी तालुक्यातील राजाटाकळी येथील सुरेश तुकाराम आर्दड (वय ३३) या युवकाचा शनिवारी रात्री १० वाजेच्या सुमारास कुंभार पिंपळगांव परिसरातून अपहरण करण्यात आल्याचे समोर आले होते. रविवारी बुलढाणा जिल्ह्यातील तडेगाव – टाकरखेडा रोडवरील एका शेतात या तरूणाचा मृतदेह आढळून आला.
किनगाव राजा पोलीसांनी मृत व्यक्तीची ओळख पटवून उत्तरीय तपासणी केली व त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणी मयत व्यक्तीचे चुलत बंधू फिर्यादी सुभाष आर्दड यांनी दिलेल्या तक्रारीवरून हरी कल्याण तौर, सखाराम ऊर्फ खन्ना बप्पासाहेब आर्दड (राजाटाकळी), मिनाज बाबामिया सय्यद (कुं.पिंपळगांव) व चालक अशा चार जणांविरूध्द घनसावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आल्याचे पोलीसांनी सांगितले.